
तुम्ही भारतात राहणारे आणि तुमचे आजचे वय 40_50 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला लवकरात लवकर रिटायरमेंट प्लॅनिंग आणि फायनान्शिअल प्लॅनिंग करणे आवश्यक आहे.
भारत मागच्या एक दोन दशकांपासून तरुणांचा देश होता. आता हाच तरुणांचा देश पुढच्या एक-दोन दशकांमध्ये म्हाताऱ्यांचा देश होणार आहे.
भारतात मागच्या काही दशकांपासून सरासरी आयुष्यमान वाढत गेले आहे. नवीन बर्थ रेट कमी होत गेले आहे. भारताची लोकसंख्या कमी होण्याचे प्रमाण जवळजवळ सुरू झाले आहे.
येणाऱ्या एक-दोन दशकात भारतात तरुण कमी आणि म्हातारे जास्त असणार आहे. या कमी तरुणांवर अधिक म्हातार्यांची जबाबदारी असणार आहे.
तुमच्या आजूबाजूला सहज सर्वे करून बघा. तुम्हाला चाळीशीच्या आत मधल्या जोडप्यांना एक किंवा शून्य मुले असलेली दिसतील. ज्यांनी ठरवून शून्य मुले होऊ दिले आहेत त्यांनी सर्वप्रथम आपली रिटायरमेंट प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. एक मुल आहे त्यांच्या केस मध्ये जेव्हा ते मुल लग्न करेल तेव्हा त्याच्यावर आणि त्याच्या जोडीदारावर दोघांचे आई वडील, काही केस मध्ये आजी आजोबा आणि स्वतःचे मुल या सगळ्यांची जबाबदारी येणार आहे. त्यामुळे कुटुंबांमध्ये प्रचंड मानसिक आणि आर्थिक तणाव निर्माण होतील. त्यासाठी आजच्या तरुणांना आजच प्लॅनिंग करणे गरजेचे आहे.
चीनमध्ये वन चाईल्ड पॉलिसीमुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. एका जोडप्यावर दोघांचे आई-वडील, कधीतरी आजी आजोबा आणि मुले अशा पाच सहा पेक्षा अधिक लोकांची जबाबदारी येऊन ठेपते. त्यावेळी इतक्या सगळ्यांना सांभाळणे शक्य होत नाही.
भारतात १९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतर अचानक मोठ्या कंपन्या आल्या, तिथेच भारतीय कंपन्या बहुराष्ट्रीय झाल्या. याद्वारे एक नवमध्यमवर्ग निर्माण झाला. या वर्गाच्या अपेक्षा आणि आकांक्षा वाढत गेल्या. त्या पोटी निसर्गाने रिप्रोडक्शन साठी ठरवून दिलेल्या आदर्श बायोलॉजिकल वयापेक्षा उशिराने लग्न होणे आणि पर्यायाने उशिरा मुलं होणे हे सुरू झालं. आज आज यशस्वी करिअर असलेले मुलं मुली तीशी नंतर लग्न करत आहेत, चाळिशीच्या आसपास मुलांना जन्म देत आहेत. आदर्श बायोलॉजिकल वय निघून गेल्यामुळे किंवा चुकीच्या लाईफस्टाईल मुळे यातल्या कित्येक जोडप्यांना वंध्यत्व येत आहे. पुण्या-मुंबईत गल्लीबोळात सुरू झालेले इनफर्टिलिटी क्लिनिक आपण सगळे पाहतच आहोत. पस्तीशी चाळीशीत मुलं झाल्यावर ते मुल सेटल होईपर्यंत या जोडप्याची सत्तरी येणार आहे.
भारतात आर्थिक उदारीकरणानंतर माझ्या आणि त्यानंतरच्या एक दोन पिढ्यांना संधी निर्माण झाल्या. अशाच संधी पुढच्या पिढ्यांसाठी असतील याची सुद्धा शाश्वती देता येत नाही. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढ्यांची सेटलमेंट किती स्थिर राहील याविषयी मोठे प्रश्नचिन्ह आहेत. काळच त्यांचे उत्तर देईल.
रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे फक्त आर्थिक नियोजन नाही. त्यात तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे सुद्धा प्लॅनिंग आवश्यक आहे.
आपल्या रिटायरमेंटच्या काळात आपल्या मुलांवर आर्थिक ओझे न बनणे इतके पुरेसे नाही, त्याचबरोबर आपले म्हातारपण कमीत कमी रोग आणि व्याधींमध्ये जावे यासाठी सुद्धा प्लॅनिंग करायला हवी.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, म्हातारपणात एकटेपणा हा सगळ्यात त्रासदायक प्रॉब्लेम असतो. त्या काळात मिनिंगफुल रिलेशन्स असणे गरजेचे असते. अशा प्रकारचे नाते दीर्घकाळाच्या मैत्रीनंतर आणि आणि एकत्र मेमोरीज बनवल्यानंतरच निर्माण होऊ शकते. त्यासाठी आपल्या उमेदीच्या काळात काही मिनिंगफुल रिलेशन्स असणे आणि त्यांच्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. ही सुद्धा रिटायरमेंट प्लॅनिंग आहे. पुण्यात औंध मध्ये जिथे मी राहतो तो सगळा निवृत्त लोकांचा परिसर आहे. करोडो रुपये किंमत असलेले फ्लॅटमध्ये हे निवृत्त लोक राहतात. त्यांची मुलं एक तर विदेशात किंवा पुण्यात असूनही दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहतात. या लोकांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम एकटेपणा हा आहे. (मुलांनी आई-वडिलांना सांभाळावे किंवा नाही हा पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, या विषयावरून मी कुणालाही जज करणार नाही.)
आपली मुलं म्हणजे आपली रिटायरमेंट प्लॅनिंग नाही.
टीप: हे लिखाण खूप निगेटिव्ह वाटत असले तरी माझ्या मते ते रियालिस्टिक आहे. प्लॅनिंग करताना नेहमी वाईटात वाईट काय होऊ शकते हा विचार केला पाहिजे.
Discover more from Vittartha
Subscribe to get the latest posts sent to your email.